आनंदाचं सेलिब्रेशन

T-२० विश्वचषक २०१६. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना. बांगलादेशला भारताच्या विरुद्ध T-२० सामन्याच्या पहिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ३ बॉलमध्ये केवळ २ धावांची गरज होती. भारताने केलेल्या १४७ धावांच्या आव्हानातील १४५ धावा बांगलादेशने सहजपणे पूर्ण केल्या होत्या. बांगलादेशचा फलंदाज सामना पूर्ण झाल्याच्या अविर्भावात खेळत होता. तो खूप उत्साहित झाला होता. षटकार मारून आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी त्याने जोरात बॉल फटकावला. अति उत्साहामुळे बॉल त्याला नीट मारता आला नाही आणि षटकाराऐवजी भारताच्या खेळाडूच्या हातात सोपा झेल गेला. पुढे आलेला फलंदाज यातून काही धडा घेऊ शकला नाही. तो सुद्धा अशाप्रकारे बाद झाला. शेवटच्या बॉलवर आणखी एक फलंदाज रनआउट करून भारताने हा सामना २ धावांनी जिंकला.

भारत हा सामना जिंकला असं म्हणण्यापेक्षा बांगलादेश हा सामना हरला असंच म्हणावं लागेल. कारण जरी भारतीय कर्णधाराने ताणाचे समायोजन योग्य प्रकारे केले तरी हातात आलेली मॅच घालवण्यासाठी बांगलादेशी फलंदाजांनी लवकर सुरु केलेल्या मॅच जिंकण्याच्या आनंदाच्या सेलिब्रेशनमुळे त्यांचे उरलेल्या धावा काढण्यामागचे लक्ष उडाले आणि बांगलादेश मॅच हरला. अजून केवळ २ रन काढल्यानंतर बांगलादेश सामना जिंकणारच होता. हत्ती गेला होता आणि शेपूट राहिले होते. पण केवळ विवेकी विचारांचा अभाव असल्यानेच त्यांचा पराभव झाला. पण हा पराभव त्यांना अनुभव समृद्ध करून गेला. यानंतरच्या कोणत्याही सामन्यात बांगलादेश असं वागला नाही. पण नेहमी अनुभवातून, आपले नुकसान झाल्यावर आपण शिकू लागलो तर आपला भावनांक नक्कीच वाढेल पण ते आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे भावनांक वाढवण्यासाठी अनुभव आणि भावनांकाचे शिक्षण यात समतोल असणं गरजेचं आहे. आनंदाचं अचूकवेळी सेलिब्रेशन कसं करावं या कौशल्यांचं शिक्षण घेणं हे यामुळे महत्वाचं ठरतं.

आनंदाचं अचूकवेळी सेलिब्रेशन म्हणजे काय?

इंग्रजीमध्ये या कौशल्याला आनंद पुढे ढकलणं (डिलेड ग्रॅटीफिकेशन) असं म्हणतात.

आपलं काम पूर्ण होत असतानाच मिळणारा अथवा मिळत असलेला थोडासा आनंद उपभोगण्याच्या इच्छेकडं दुर्लक्ष करून कार्य पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या जास्त महत्वाच्या आनंदाकडे लक्ष देणं आणि तो जास्त महत्वाचा आनंद सेलिब्रेट करणे म्हणजेच आनंदाचं अचूकवेळी सेलिब्रेशन करणे होय. हे कौशल्य आपल्याला स्वयं-शिस्त लावते, आपल्याला स्व-नियंत्रण करायला शिकवते. आणि आपल्या भावना, विचार आणि कृती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मदत करते. उत्तम भावनांकाचं हेच तर प्रमुख लक्षण आहे.

प्राचीन काळी भारतात मानसिक कौशल्यांचा किती गहन अभ्यास होत होता याचं प्रमुख उदाहरण म्हणजे भगवद्गीतेतील एक खूप सुंदर आणि सर्वपरिचित श्लोक.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

हा श्लोक आपल्याला या सेलिब्रेशनच्या थोडसं पुढेच घेऊन जातो. कोणत्याही वेळेच्या सेलिब्रेशनपेक्षा आपल्याला आपण करत असलेल्या कार्यावर लक्ष द्यायला शिकवतो. आपण स्वयंशिस्तीचा अंगीकार करून योग्य वेळी आनंदाचं सेलिब्रेशन करूया.

धन्यवाद!

अजिंक्य गोडसे,
सायकोथेरपीस्ट,
डॉ हेडगेवार रुग्णालय, इचलकरंजी.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करूया ताणाचा सामना

को जागर्ति

आणि माझा कचरा झाला…?